निमगिरी
|सह्याद्रीच्या बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगअनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्याघाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगडाच्या समोर निमगिरी आणि हनुमंतगड हे किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या कातळात खोदलेल्या पायर्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
निमगिरी आणि हनुमंतगड हे दोन जोड किल्ले एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. दोन्ही किल्ले पाहायला चार तास लागतात.
निमगिरीची माहिती साईटवर दिलेली आहे.
निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळे पुढील मैदानातून इलेक्ट्रीक टॉवरच्या दिशेने चढत जावे. टॉवरच्या वरच्या टप्प्यावर चढुन गेल्यावर शेतजमिनीचे तुकडे आहेत. या टप्प्यावर पायवाट सोडून डाव्या बाजूला गेल्यावर उघड्यावर असलेली एक सुंदर मुर्ती आणि मंदिराचे काही अवशेष दिसतात. त्याच्या समोरच एक मोठे पाण्याचे टाक आहे. पुन्हा पायवाटेवर येऊन चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला झाडीत लपलेली गणपतीची मुर्ती, पिंड आणि नंदी पाहायला मिळतो. थोडे पुढे चढुन गेल्यावर एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मुर्ती आहे. समोरच एक समाधीचा दगड आहे. त्यावर शिल्प कोरलेल आहे. पुढे थोड्याच अंतरावर ४२ वीरगळ एका रांगेत ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्यातील काही वीरगळींवर शिलालेख कोरलेले आहेत.
वीरगळी पाहून खिंडीच्या दिशेने अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. या गुहा टेहळणीसाठी बनवलेल्या आहेत. इथून कातळात खोदलेल्या पायर्यांची वाट आहे. पण पायर्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झालेली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते. या वाटेच्याच खाली एक पायवाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधिल खिंडीत जाते. या वाटेने आपण १५ मिनिटात खिंडीत पोहोचतो. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे.
डाव्या बाजूला असलेल्या डोंगरावर चढतांना मधेच कातळ कोरीव या पायर्या लागतात. खिंडीतून १० मिनिटात हनुमंतगडाच्या गडमाथ्यावर पोहोचता येते. हनुमंतगडाचे प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूचे बुरुज शाबुत आहेत. पण प्रवेशव्दार कमानी पर्यंत मातीत गाडलेले आहे. प्रवेशव्दारा वरील व्दारशिल्प ओळखण्या पलिकडे झिजलेल आहे. प्रवेशव्दार पाहुन प्रवेशव्दारा मागील टेकडी न चढता उजव्या बाजूला तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर एक भव्य टाक पाहायला मिळत. टाक पाहून टेकडी चढुन गेल्यावर उध्वस्त घरांचे अवशेष दिसतात. त्याचेच दगड वापरुन गडावर येणार्या गुराख्यांनी तात्पुरता निवारा उभारलेला आहे. उध्वस्त वास्तू पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला पठार आहे. त्या पठारावर तीन पाण्यची टाकी आहेत. ती पाहून प्रवेशव्दाराकडे येतांना वाड्याच्या खालच्या बाजूला एक सुकलेल टाक दिसते. ते पाहून दरवाजापाशी परत आल्यवर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडावरून हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्लाही दिसतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास लागतो.
किल्ला उतरतांना वीरगळींपाशी येउन उजव्या बाजूस चालत गेल्यावर काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागे २ वीरगळी आहेत.
राहाण्याची सोय :
काळुबाई मंदिरात १०, निमगिरी किल्ल्यावर गुहेत ६ लोक राहू शकतात.
जेवणाची सोय :
आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
निमगिरीवर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
