माणुसकी हरवली आहे……
|
ते दिवस केव्हाच गेले जेव्हा घर अस्तित्वात होती,स्वयंपाकाचा वास येताच पाखर अंगणात यायची अन चोचीत दोन घास घेउनी पोटभर आशीर्वाद द्यायची.आधीची घर अगदी सरळ आणि साधी होती,शेणामातीने सारवलेली जमीन देखील मऊ गादी होती,माणुसकीच्या भिंतीत प्रेमाचा ओलावा असायचा…..थरथरनाऱ्या वृद्ध हातांना कोवळ्या जीवांचा आधार वाटायचा.आता मात्र चित्र सगळ पलटून गेलं माणसांच्या गर्दीत फक्त चेहरेच उरले नितीमत्ता आणि आपुलकी नामशेष झाली.आज आपली घर साधनांनी तर भरली पण सुख मिळालं नाही,संपत्ती वारेमाप कमवली पण ती आपत्तीत कामात आली नाही.म्हणतात..कि दुसऱ्यासाठी रडू येण ह्यासाठी अंतकरण प्रेमळ असावं लागतं,पण ओलचं नाही तर वाढणार तरी कसं.
एक घास काऊचा एक घास चिऊचा असं म्हणून आई बाळाला भरवायची आणि बाळही मोठ्या आनंदाने तो खाऊ खायचा,पण आता मात्र काऊहि दिसत नाही चिऊ पण दिसतं नाही.कारण घासा-घासातल,श्वासा-श्वासातलं,हाडा-मासातलं नात कुठेतरी हरवलं आहे.अंतकरण कोरड पडत चाललं आहे.आधी रस्ते साधी होती म्हणुन माणसंही साधी होती,आता रस्ते डांबरी झाली आणि माणसंही डांबरट झाली.
रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या व्यक्तीला दवाख्यान्यात नेऊन टाकण्याचं सौजन्य कुणी दाखवत नाही,हवं तर फोटो काढतील,आपल्या मित्रांना share करतील पण मदतीचा हात आखाड्लेलाचं….! प्रत्येकाला भीती आपल्या परिवाराची,आपल्या संपत्तीची मात्र देश खड्यात गेला तरी आम्हाला फरक पडत नाही.फक्त निषेध आणि निषेध नोंदविन्या पलीकडे आपण काहीही करत नाही.उलट सरकार आणि प्रशासनाला दोषी ठरवून आपल्या नाकर्तेपण लपवित राहण, बास….. एवढंच आपल्याला जमत.
नुसत्या मेणबत्त्या जाळल्या म्हणून आपली सौजन्यता पूर्ण होत नसते,तर माणुसकीचा हात पुढे केला तर आपली नितीमत्ता सुधारत असते.बदल हवा,बदल हवा अशी वल्गना करणाऱ्यांनो..! तुम्ही कधी बदलणार.?नुसती अंगावरची कापड बदलली म्हणजे आपण आधुनिक झालो असा भ्रम काढून टाका,विचार बदला,विकृती बदला…..आणि सामाजिक संवेदनांची जाणीव असू द्या.कारण तुम्ही पण एक माणूस आहात….आणि माणूस माणसाला जरी मारत असला तरी माणसाने माणसाला अजुन खाल्लेलं नाही.त्यामुळे माणुसकीचा झरा आटू देऊ नका.