राजकारणाचे शुद्धीकरण करणारा ऐतिहासिक निर्णय
|गेल्या आठवड्यात एक क्रांतिकारी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला! एखाद्या गुन्ह्यांत दोषी आढळलेल्या आणि किमान दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या व्यक्तीला कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवून त्याचे पद तत्काळ रद्द करण्याबाबत ऐतिहासिक पाउल सर्वोच्च न्यायालयाने उचलले!
खरेतर राजकीय शुद्धीकरण करणाऱ्या ह्या कायद्याची संसदेत निर्मिती होणे अभिप्रेत होते, मात्र कोण स्वतःलाच लगाम लाऊन घेणार? हा निर्णय घेतांना न्यायालयाने दोषी व्यक्तीकडून अपील करण्याचीही सवलत काढून घेतली. त्यामुळे वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे.
ह्या निर्णयामुळे राजकारणी लोक आपल्या चरित्राविषयी किती जागरूक राहतील हा संशोधनाचा विषय असला तरीही गैरकृत्य करण्याआधी आपल्या राजकीय कारगीर्दीची त्यांना चिंता जरूर करावी लागणार आहे. अनेक लोकप्रतिनिधी गुंडांना हाताशी धरून राजकारण करीत असतात. अनेक गुंडही राजकारणात आपले नशीब आजमावतात. ह्या निर्णयामुळे अशा खलप्रवृतींचा राजकीय प्रवेशही थांबणार आहे!
ह्या निर्णयाची जर खरोखर काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर भारतीय राजकारणाचे शुद्धीकरण करणारा एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय म्हणून ह्या कायद्याची ओळख निर्माण होईल!