लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाझर तलाव
|२९ जुलैची घटना आहे. नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातील चिंचवे लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाझर तलावाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम दुरुस्तीचे काम चालले होते. हे काम पाहण्याकरीता पाटबंधारे विभागातील पाच अभियंते त्याठिकाणी गेले असता निर्गमन विहिरीजवळील सुमारे ५० फुट उंचीचा मातीचा ढिगारा अचानक कोसळला आणि त्या ढिगाऱ्याखाली दबल्याने ह्या पाचही अभियंत्यांना प्राण गमवावे लागले. ही घटना अतिशय दुःखद आणि मनाचा थरकाप उडविणारी आहे.
यांत सांगायचा मुद्दा असा आहे की, ज्या ठेकेदाराच्या हाती हे काम सोपविले गेले त्याची गुणवत्ता आधीच का नाही तपासली गेली? आधीच त्याबाबत काळजी घेतली गेली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती. पाझरतलावाच्या निकृष्ट कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मंडळी गेली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले आणि पाझरतलाव दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि त्यात ह्या पाच अभियंत्यांचा दुर्दैवी अंत झाला. याआधीच दोन अभियंत्यांनी हे काम इमानदारीने केले असते, तलावाच्या गुणवत्तेबाबत काळजी घेतली असती आणि तशा सूचना संबंधित ठेकेदाराला करून काम करवून घेतले असते तर निश्चितच असा दुर्दैवी प्रसंग ओढवला नसता. कामाच्या गुणवत्तेबाबत ठेकेदारावर वचक ठेवली जात नाही. ‘चिरीमिरी’ने सगळेच प्रश्न सोडविले जातात , त्यातून असे दुर्दैवी प्रसंग घडतात. यापुढे तरी सरकारी अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी लाचखोरीला आळा घालून इमाने-इतबारे कामे करावीत. कामाच्या दर्जाबाबत जागरूक राहावे.