स्कूल चले हम…….

     imagesग्रामीण भागात दुचाकीवरून फिरतांना कधी एखाद्या शाळकरी मुलाने तुमच्याकडे लिफ्ट मागितली आहे? कधी मागितली तर अवश्य लिफ्ट द्या! बऱ्याचदा हि मुले गरीब घरची किंवा आदिवासी वस्तीतली असतात. साधन कुटुंबातील मुले एकतर रिक्षा, स्कूलबस किंवा त्यांना कुणीतरी वाहनाने शाळेत सोडायला जात असतात. मात्र गरीब किंवा आदिवासी मुलांच्या पालकांना दोन वेळच्या जेवणाची सोय करायची असल्याने कामापासून फुरसतही मिळत नाही आणि त्यांच्याकडे वाहनाचीही व्यवस्था नसते. शाळा दूर असल्याने आणि शाळेत जाण्यासाठी वाहन करण्याची ऐपत नसल्याने बिचारी पायी चालतच शाळा गाठतात. हे अंतर काही मैलांचेही असू शकते. आपल्या रस्त्यात त्यांची शाळा येत असल्यास त्यांना लिफ्ट देण्यात काय हरकत आहे?

     अशा मुलांना लिफ्ट दिल्यावर त्यांच्याशी संवाद साधला तर फार गमतीशीर वाटते! त्यांना शाळेविषयी एखादा प्रश्न विचारल्यास ते अभिमानाने त्याचे उत्तर देतात. आपण त्यांना मदत केली म्हणून कृताज्ञातही व्यक्त करतात. आदिवासी लोकांमध्ये पूर्वी शिक्षणाविषयी अनास्था होती. त्यामुळे त्यांच्या कित्येक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिल्या. आता मात्र सर्व शिक्षा अभियानामुळे आदिवासी पाड्या-वस्त्यांवरील मुले शाळेत जाऊ लागली आहेत. निरक्षरतेचा नायनाट होऊन साक्षर भारत बनविण्याचा ह्या योजनेचा मुळ उद्देश आहे. ‘स्कूल चले हम’ च्या योजनेला आपणही आपले काम करता-करता लावलेला हातभार नक्कीच मोलाचा ठरू शकतो!

One Comment