‘संशय’

“संशय ” आयुष्यातील सर्वात वाईट सवय . पण एकदा जर का ती लागली कि खूप खूप त्रास होतो सर्वाना . लग्नामुळे एकत्र आलेल्या दोन जीवांमध्ये लग्नानंतर समर्पणाचं, विश्वासाचं एक अतूट नातं तयार होणं खूप महत्वाचं आहे! doubt
पत्नी आपले आई-वडील, भाऊ-बहिण इतर सर्व तिच्यावर प्रेम करणारी, तिची काळजी घेणारी माणसे सोडून एका नवीन घरात प्रवेश करते आणि त्यालाच आपले सर्वस्व मानते. असे करतांना तिने केलेला त्याग लक्षात घ्यायला हवा.
नवीन घरात इतर कुणी कसेही वागले तरीही तिचा हक्काचा पती तिच्याशी प्रेमाने, विश्वासाने वागत असेल तर ती इतर सर्व दुःख विसरून जाते! मात्र, पतीच जर संशयी असेल तर?  तिच्यावर सतत इतर कुणाशीतरी तिचे ‘संबंध’ आहेत असा आरोप करीत असेल तर?

टी.व्ही. वर प्रदर्शित होणाऱ्या अनेक मालिकांत आपल्याला हा विषय बघायला मिळतो, मात्र प्रत्यक्षात जर असे झाले तर?
तिच्या पायाखालची वाळूच सरकते! कुठलीही चूक नसतांना कठोर शिक्षा तिला भोगावी लागते. संशयी पती तिच्याशी तुसडेपणाने वागत असेल, सगळ्यांसमोर वारंवार तिचा अपमान करत असेल तर घरातील इतर लोकही तिच्याशी निट वागत नाहीत. त्यातच ती खचते. ‘कितीही चांगले वागले तरीही आपले नशीब करंटेच’ असा न्यूनगंड तिच्या मनात घर करतो. तिच्या मनात जीवाचे काही बरे-वाईट करण्याचा विचार देखील येऊ शकतो. म्हणूनच पती-पत्नीमध्ये विश्वासाचे नाते तयार होणे ही त्या नात्याची गरज आहे.
पत्नी आपले घर-दार, आई-वडील आणि इतर सर्व नात्यांचा त्याग करून केवळ आपल्यासाठी, आपली म्हणून आपल्याकडे आली आहे याचे भान पतीने ठेवायला हवे. आपल्यावर इतरांचा विश्वास असावा असे तर प्रत्येकालाच वाटते, तसं, आपणही आपल्या पत्नीवर विश्वास ठेवायलाच हवा! तिला पुरेसा वेळ दिला, आपसांत चांगला संवाद राखला तर एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल आणि ‘संशय’ मनात घर करणार नाही.