मुलांच्या जीवनातील पालक…….
| हल्लीचे पालक आपल्या पाल्यांबाबत अधिक जागरूक झालेले आढळतात. पूर्वीचे पालक जागरूक नव्हते असे माझे म्हणणे नाही, मात्र त्यांचा कल मुलांना घरात शिस्त लावण्यापुरता मर्यादित होता. आता मात्र, आपली मुले काय करतात? कुठे जातात? त्यांचे मित्र-मैत्रिणी, आवडी-निवडी, त्यांचे वागणे-बोलणे इतकेच काय तर त्यांच्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईट वरील खात्यांवरही बारीक नजर ठेवायला लागले आहेत. पालकांनी मुलांचे मित्र बनून राहावे हे ठीक आहे, पण त्यांच्या किशोरवयीन स्वातंत्र्यावरच गदा येईल इतपत त्यांच्या जीवनात डोकावणे खरोखरच योग्य नाही. त्याला जीवनातील धोक्यांबद्दल नक्कीच जाणीव करून द्यावी, मात्र त्याच्या मुक्त वावरण्यावर अकारण निर्बंध लादू नयेत. सावलीखाली रोपट्याची वाढ खुंटते, त्याला मोकळीक दिली तर ते जोमाने वाढतं! तसच मुलांचं. म्हणून त्यांच्या सगळ्याच चुकांवर डोळ्झाक करू नये. त्याच्या चुका त्याच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्यांवर मात करण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनही करावे.
मुलांनीही त्यांच्या जीवनातील पालकांचे अस्तित्व मान्य करायला हवे. वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवरील त्यांचे मत जाणून घ्यावे. आपल्या अडी-अडचणी त्यांच्यासमोर मांडाव्यात. आपले विचार, योजना यांमध्ये आपल्या पालकांनाही सामील करून घ्यावे. मुलांमध्ये अमाप उत्साह ठासून भरलेला असतो, त्याला जर अनुभवाची जोड मिळाली तर जीवनात यशप्राप्ती निश्चित होते आणि हा अनुभव आपल्याला पालाकांकडूनच मिळतो!
khupch wastwdarshi lekh